You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली विधानसभा: अमित शाह यांची कबुली 'वादग्रस्त विधानांमुळे पराभव' #5मोठ्या बातम्या
आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे
1. वादग्रस्त विधानांमुळे पराभव झाला असावा- अमित शाह
दिल्ली विधानसभांचा निकाल जाहीर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाजपच्या पराभवावर मत व्यक्त केले आहे.
गोली मारो, इंडिया पाकिस्तान मॅच अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपाचा पराभव झाला असावा असं त्यांनी मत टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना व्यक्त केले. मात्र लोकांनी नक्की का असे मतदान केले हे माहिती नाही असंही ते यावेळेस म्हणाले.
वादग्रस्त विधानं दुर्दैवी होती असं सांगून असा विधानांपासून पक्षाने तात्काळ दूर राहाण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, शांततामय मार्गाने विरोध प्रदर्शित करण्याला परवानगी मात्र कायदा मोडण्याची कोणालाही परवानगी नाही.
विद्यार्थ्यांनी बसेस, स्कूटर्स, कार जाळल्यानंतरच पोलिसानी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात प्रवेश केला असं ते म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
2. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या एनआयए तपासाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यावर माझा निर्णय फिरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
एनआयए तपासावरुन केंद्र आणि राज्य यांनी वेगवेगळी भूमिका घेतली होती. आता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयए तपासाला मान्यता देऊन आपली सहमती असल्याचं स्पष्ट केलं आहे.
नक्षलवादी कारवायांशी संबंधित बाबी असून अन्य राज्यांमध्येही धागेदोरे आढळून आल्याने हा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यासाठी एनआयए कायद्यानुसार केंद्र सरकारला अधिकार असून राज्य सरकारची सहमती घेण्याचीही गरज नाही; पण राज्य सरकारशी सल्लामसलत न करता परस्पर निर्णय घेतल्याने गृहमंत्री देशमुख यांनी 'एनआयए'कडे तपास सोपविण्यास विरोध केला होता. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले.
3. नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन एस. जयशंकर आणि रामचंद्र गुहा यांच्या ट्वीटरयुद्ध
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्यामध्ये ट्वीटरवर युद्ध सुरु झाले आहे.
व्ही. पी. मेनन यांच्या चरित्राचे प्रकाशन करुन, नेहरु वल्लभभाई पटेल यांना कॅबिनेटमध्ये घेण्यास इच्छुक नव्हते आणि त्यांनी कॅबिनेटच्या सुरुवातीच्या यादीतून पटेलांचे नाव काढले होते असे ट्वीट केले होते.
त्यावर रामचंद्र गुहा यांनी ही माहिती खरी नसल्याचे सांगत फेक न्यूज आणि आधुनिक भारताच्या दोन निर्मात्यांमधील शत्रूत्वाच्या खोट्या बातम्या पसरवणे हे परराष्ट्रमंत्र्यांचे काम नाही. तुम्ही या गोष्टी भाजप आयटीसेलसाठी सोडून दिल्या पाहिजेत असं ट्वीट केलं. त्यावर जयशंकर यांनी ट्वीट करुन मेनन यांच्यावरील पुस्तकाचे वाचन करण्याचा सल्ला गुहा यांना दिला आहे.
त्याला नेहरु पटेलांना आपल्या कॅबिनेटमधील मजबूत स्तंभ म्हणून केस पाहात असत हे दर्शवणारी पुस्तकं वाचण्याचा सल्ला गुहा यांनी परराष्ट्रमंत्र्यांना दिला आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
4. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील लेखांवरुन काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिदोरी मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील लेख मागे घेणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. हा लेख आक्षेपार्ह असून राज्य शासनाने त्यावर बंदी आणावी अशी मागणी भाजपने केली होती.
या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अतिशय गलिच्छ आणि विकृत स्वरुपाचे लेखन करण्यात आले आहे. शिवसेनेला हे चालते का असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
मध्य प्रदेशात शिवाजी महाराजांचा अपमान, राजस्थानमध्ये सावरकरांचे चित्र काढून टाकण्याचा निर्णय घेणे असे एकापाठोपाठ प्रकार होत असताना काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला उत्तर द्यावेच लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
5. डबेवाल्यांना हक्काचं घर
मुंबईच्या डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
अजित पवार यांनी तसे ट्वीटही केले आहे. तसेच डबेवाला भवनाचा प्रश्नही मार्गी लावावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलिप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)