रफाल : 2022 पर्यंत देशाला 36 रफाल विमानं मिळतील - निर्मला सीतारामन

वाचन वेळ: 1 मिनिटे

रफालवरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना आज लोकसभेत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. रफाल करारावरुन राहुल गांधी मगरीचे अश्रू ढाळत असल्याची टीका सीतारामन यांनी केली आहे. तसंच आमचं सरकार आल्यानंतर HAL ची परिथिती सुधारली आहे. आधी केवळ 8 विमानांची निर्मिती करणारी HAL आता 16 विमानांची निर्मिती करत आहे, असं सीतारामन यांनी म्हटलंय.

तसंच बंगलोरमध्ये जाऊन HAL च्या कर्मचाऱ्यांसाठी रडणाऱ्या राहुल गांधी यांनी आपल्या अमेठी मतदारसंघात जाऊन कधी HAL च्या कर्मचाऱ्यांशी बोलणी का केली नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे.

सीतारामन यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

1. देशाच्या सुरक्षेशी प्रतारणा केली जाणार नाही. भारताला चीन आणि पाकिस्तानकडून धोका आहे. त्यामुळे देशाला अत्याधुनिक शस्त्रांची गरज आहे.

2. 10 वर्षांत चीननं तब्बल 400 विमानं घेतली, आपल्याकडे फक्त 33 विमानं आहेत. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

3. 2006 ते 2014 या काळात यूपीए सरकारनं रफाल करार का केला नाही? हा करार झाला असता तर आतापर्यंत ही विमानं देशाला मिळाली असती. काँग्रेसनं 8 वर्षं चर्चेत घालवली.

4. आम्ही विमानं खरेदी करू शकत नाही, कारण आमच्याकडे पैसा नाही, असं तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी 2014च्या फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं.

4. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात देशाला पहिलं विमान मिळेल, तर 2022 पर्यंत सर्व 36 विमानं देशाच्या ताफ्यात सामील होतील.

6. आम्ही देशाच्या सुरक्षेबाबत सौदा करत नाही तर सुरक्षेसाठी करार करतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)