एका कथित हत्येच्या प्रकरणानं भारत-कॅनडाचे संबंध कसे बिघडले?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2023 मध्ये भारत सरकारविरोधात कॅनडात निदर्शनं करणारे नागरिक
    • Author, बीबीसी भारतीय भाषा
    • Role, दिल्ली आणि ब्रँपटन
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

गेल्या वर्षी जूनमध्ये कॅनडात शीख फुटीरतावादी आणि कॅनडाचा नागरिक असलेल्या हरदीप सिंह निज्जरची हत्या झाली. या हत्येची कॅनडात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा सहभाग होता असा आरोप कॅनडाने केल्यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत.

दोन्ही देशांनी संबंधित राजदुतांची हकालपट्टी केली आहे आणि या घटनेवर तीव्र स्वरुपाचं शा‍ब्दिक युद्धही झालं आहे.

या घटनाक्रमामुळे कॅनडात बहुसंख्येने असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कॅनडामधील ब्रॅम्पटन शहरात बीबीसी टीमशी बोलायला अनेक लोक घाबरत होते. आपलं नागरिकत्व किंवा व्हिसा धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटत होती.

फोटो स्रोत, Getty Images

एका पत्रकार परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हकालपट्टी केलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावले. या अधिकाऱ्यांचे हितसंबंध होते आणि कॅनडाच्या भूमीवर गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला.

भारताने त्याला तातडीने प्रत्युत्तर दिलं. हे आरोप म्हणजे अत्यंत बिनबुडाचे असून ट्रुडो सरकार मतांसाठी म्हणजे शीख लोकांच्या मतासाठी राजकारण करत आहे असा आरोप भारताने केला आहे.

त्यानंतर कॅनडाच्या पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेऊन दावा केला की, भारताचा या हत्याकांडांत आणि इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रुडो यांची जी-7 परिषदेत जूनमध्ये आणि गेल्या आठवड्यात ASEAN परिषदेत गेल्या शुक्रवारी (11 ऑक्टोबर) भेट झाली होती.

शीख आणि कॅनडा

कॅनडामध्ये शीख समुदायाची लोकसंख्या 7,70,000 असून ते कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के आहे. त्यामुळे त्यांची व्होट बँक अतिशय मोठी आहे.

कॅनडा हे भारतातील पंजाबी लोकांचा अत्यंत आवडीचा देश असून तिथे जाण्यासाठी लोकांना निर्विघ्नपणे प्रवेश मिळवून देण्यासाठी अनेक प्रवास कंपन्या उत्सुक असतात.

कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह हे एक शीख नेते आहेत. त्यांनी अगदी आतापर्यंत ट्रुडो सरकारला पाठिंबा दिला होता. कॅनडाच्या मंत्रिमंडळात शीख मंत्री मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेक जण खासदारही आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र तेथील काही भारतीय-कॅनेडियन शीख हे खलिस्तान चळवळीचे समर्थक असल्याचं भारताचं मत आहे. भारतातून एक भाग वेगळा काढून शिखांसाठी खलिस्तान नावाचा वेगळा देश तयार करावा अशी मागणी दीर्घ काळापासून होत आहे.

पंजाबमध्ये 1980 च्या दशकात खलिस्तान चळवळ जोरावर होती. त्या भागात तेव्हा हल्ले झाले आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला.

भारतीय लष्कराने विशेष अभियान राबवल्यावर या चळवळीची हवा निघून गेली होती.

फोटो स्रोत, Getty Images

अमृतसर येथील सुवर्णमंदिराचा लष्कराने ताबा घेतला होता. त्यात जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा मृत्यू झाला होता. त्याचा सूड म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर 1984 मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या आणि त्यात 3000 लोकांचा मृत्यू झाला होता.

भारताने शीख फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्याबाबत कॅनडाला अनेकदा विनंती केली आहे. हे फुटीरतावादी लोक आधी झालेल्या हिंसक कारवायांशी निगडीत आहे असा भारताला संशय आहे.

कॅनडाने ही विनंती कायम धुडकावून लावली आहे. अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा मान ठेवतो अशी भूमिका कॅनडाने घेतली आहे.

निज्जर कोण होता?

हरदीप सिंह निज्जरचा जन्म पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात झाला होता. 1997 मध्ये तो तरुण असताना कॅनडात आला होता. तिथे त्याने लग्न केलं. त्याला दोन मुलं आहेत आणि तो प्लंबर म्हणून काम करत होता.

ब्रिटिश कोलंबिया भागात तो स्थिरस्थावर झाला होता आणि खलिस्तानचा समर्थक म्हणून त्याने नाव कमावले.

भारताने त्याला आतंकवादी ठरवले होते. खलिस्तान टायगर फोर्स (KTF) या भारतात बंदी असलेल्या कट्टरतावादी गटाचा सदस्य असल्याचा आरोप भारताने लावला होता. आणखी काही गोष्टीत सहभाग असल्याचा भारताने आरोप केला होता.

निज्जर 2007 मध्ये कॅनडाचा नागरिक झाला होता. त्याच्या समर्थकांच्या मते तो शिखांच्या स्वातंत्र्याचा समर्थक होता पण हे आंदोलन तो शांततेत करत होता. त्याला त्याच्या समुदायाबद्दल प्रचंड जिव्हाळा होता असं त्याच्या समर्थकांचं म्हणणं होतं.

गेल्या वर्षी जूनमध्ये व्हॅनकुव्हर या उपनगरातील एका गुरुद्वाराच्या जवळ हुडी असलेल्या काळे कपडे घातलेल्या दोघांनी त्याची हत्या केली. मृत्यूसमयी तो 45 वर्षांचा होता.

ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो भारतात खलिस्तान नावाचा देश उभारावा करावं अशाप्रकारचं सार्वमत घेत होता. ते कोणावरही बंधनकारक नव्हतं. सिख फॉर जस्टिस या भारतात बंदी असलेल्या गटाकडून तो हे काम करत होता.

घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याच्या आरोपाचा भारताने कायमच इन्कार केला आणि ट्रुडो यांचे आरोप हास्यास्पद असल्याचं भारताचं म्हणणं आहे.

गंभीर परिस्थिती

भारत आणि कॅनडा यांचे संबंध गढूळ झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या दोन दशकांत पाश्चिमात्य देशांशी भारताचे संबंध सुधारले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घटनाक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारताचे जी-7 देशांबरोबर व्यापारी आणि राजकीय संबंध आहेत. कॅनडा हा जी-7 देश आहे, नाटोचा सदस्य आहे. अमेरिकेबरोबर त्यांचे अगदी जवळचे आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत. अमेरिकेबरोबर भारताचे संबंध सुधारले आहेत.

ब्रॅम्पटनमध्ये करमजीत सिंह गिल, हे 25 वर्षांपूर्वी कॅनडात गेले. त्यांच्या मते फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर सामान्य नागरिकांनाही या दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका बसणार आहे.

“भारत सरकारची एक वेगळी भूमिका आहे आणि कॅनडात पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहे. मात्र तिथल्या सामान्य नागरिकांना याची फळं भोगावी लागणार आहे,” असं करमजीत सिंह गिल म्हणाले.

अमेरिकेची भूमिका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा आरोप करणारा कॅनडा हा एकमेव देश नाही.

सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेने निखील गुप्ता नावाच्या एका भारतीय नागरिकावर गुरपतवंत सिंह पन्नू या खलिस्तानी वकिलाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला होता. पन्नूने रेकॉर्डेड व्हीडिओच्या माध्यमातून भारताविरोधात संताप व्यक्त केला होता.

भारताने या आरोपांचा इन्कार केला होता आणि याविरुद्ध एक चौकशी समिती नेमली होती.

अमेरिकेने चीनकडे लक्ष ठेवून भारताबरोबरचे संबंध प्रयत्नपूर्वक सुधारले आहेत. अमेरिकेचे पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध जुने आणि ऐतिहासिक आहेत.

पाकिस्ताननेसुद्धा भारताच्या गुप्तहेरांवर आपल्या प्रदेशाच्या बाहेर आणि न्यायबाह्य हत्या केल्याचा आरोप केला होता.

गार्डिअन या वृत्तपत्राने एप्रिल 2024 मध्ये एका लेखात आरोप केला की भारताने कथितरित्या 2020 पासून एका अज्ञात मारेकराच्या साहाय्याने पाकिस्तानमध्ये 20 लोकांना मारलं आहे.

जगभरातल पसरलेल्या गुप्तहेरांमुळे आणि अंडरकव्हर मोहिमांमुळे हे आरोप सिद्ध करणं कठीण आहे. हे आरोप भारताने फेटाळले आहेत.

मात्र सौदी अरेबियामध्ये पत्रकार जमाल खाशोगीची हत्या झाली होती. त्यामुळे सीमापार होत असलेल्या अशा प्रकारच्या हत्या नवीन नाहीत.

“परिणामांच्या भीतीने बलाढ्य देशसुद्धा हे हत्याकांडांचे प्रकार करत नव्हते. मात्र शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशियाने युद्धाच्या ऐवजी अशा प्रकारच्या हत्या करणं सुरू केलं,” असं भारतीय विश्लेषक पी.के.बालाचंद्रन लिहितात.

त्याचप्रमाणे भारतीय विश्लेषक आनंद.के.सहाय यांच्या मते मोदी यांच्या नेतृत्वात जागतिक पातळीवर काहीतरी मोठं करून भारताची प्रतिष्ठा उंचावण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे. निज्जर प्रकरणात कॅनडाशी ज्या पद्धतीने वाटाघाटी करत आहे त्यावरून ती समजून घेता येईल.

“दोन्ही देशांशी आमची भावनिक नाळ जुळली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा अशी मागणी आम्ही दोन्ही सरकारला करत आहोत,” असं करमजीत सिंह म्हणाले.

“देव न करो पण एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आणि बंधनं लादली गेली कर भारत आणि कॅनडा दोन्ही ठिकाणी जाणं कठीण होईल,” ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)