पत्रकार हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमची निर्दोष मुक्तता, 7 वर्षांपूर्वी झाली होती जन्मठेपेची शिक्षा; संपूर्ण प्रकरण काय?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, गुरमीत राम रहीम सिंह (फाइल फोटो)
वाचन वेळ: 4 मिनिटे

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला 2002 सालच्या पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात निर्दोष मुक्त केलं आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, राम रहीमचे वकील जितेंद्र खुराणा यांनी शनिवारी (7 मार्च) ही माहिती दिली.

डेरा प्रमुखांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर 7 वर्षांनी न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.

याबाबत बोलताना राम रहीम यांचे वकील जतिंदर खुराणा म्हणाले, "पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं आहे."

"या प्रकरणातील इतर 3 आरोपींच्या शिक्षा कायम ठेवण्यात आल्या आहेत", असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, PTI

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना राम रहीमचे वकील जतिंदर खुराणा म्हणाले, "आज माननीय उच्च न्यायालयात छत्रपती रामचंद्र प्रकरणाचा निकाल येणार होता. मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंह यांना या प्रकरणात निर्दोष मुक्त केलं आहे."

"आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत की, गुरमीत राम रहीम सिंह यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. आज माननीय उच्च न्यायालयानेही हे मान्य केले आणि त्यानुसार त्यांना निर्दोष मुक्त केले," असं खुराणा यांनी सांगितलं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

या प्रकरणी बीबीसीने पंचकुला पोलिसांचे डीसीपी (क्राइम) मनप्रीत सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पंरतु त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती बातमीत अपडेट करण्यात येईल.

दरम्यान, पंचकुला सायबर पोलीस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, या प्रकरणात अधिकृत निवेदन मनप्रीत सिंहच देतील, इतर कोणालाही अधिकृत प्रतिक्रिया देता येणार नाही.

जन्मठेपेची झाली होती शिक्षा

पंचकुलाच्या स्पेशल CBI कोर्टाने पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राम रहीमवर 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

राम रहीम यांच्यासह कुलदीप सिंह, निर्मल सिंह आणि कृष्ण लाल या तिघांनाही कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. न्यायालयानं 11 जानेवारी 2019 ला राम रहीमला दोषी ठरवलं होतं.

या खटल्याच्या सुनावणीमध्ये राम रहीमला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करण्यात आलं होतं. राम रहीमला शिक्षाही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

2002मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी पहिल्यांदा डेरा सच्चा सौदामध्ये महिला साध्वीवर झालेल्या अत्याचाराविषयी बातमी छापली होती. ऑगस्ट 2017 मध्ये स्पेशल CBI कोर्टानं राम रहीमला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं.

ऑगस्ट 2017मध्ये न्यायाधीश जगदीप सिंह यांनी याच बलात्काराच्या खटल्यात राम रहीम यांना दोषी ठरवलं होतं. छत्रपतींच्या हत्येप्रकरणी राम रहीमला दोषी ठरविणारा निकालही जगदीप सिंह यांनीच दिला.

रामचंद्र छत्रपती हरियाणातल्या सिरसा इथं 'पूरा सच' नावाचं सायंकालीन दैनिक चालवायचे.आश्रमातल्या साध्वीसोबत झालेल्या बलात्काराच्या बातमीनंतर ऑक्टोबर 2002मध्ये त्यांची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली होती.

2003मध्ये यासंदर्भातील केस दाखल करण्यात आली होती. तर 2006 मध्ये हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबा राम रहीमला पत्रकार रामचंद्र छत्रपतींच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती

ऑगस्ट 2017मध्ये राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी हरियाणातल्या सिरसा आणि पंचकुलामध्ये हिंसा घडवली होती. त्यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणी दरम्यान हरियाणा आणि पंजाबमध्ये कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती.

याबाबत बीबीसीने 2019 साली बातमी केली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

"2000 मध्ये सिरसा येथे रामचंद्र छत्रपती यांनी वकिलीचं काम सोडून 'पूरा सच' हे सायंदैनिक सुरू केलं," असं सिरसा इथले स्थानिक पत्रकार प्रभु दयाल यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं होतं.

"2002 च्या दरम्यान त्यांना निनावी पत्र मिळालं. या पत्रात डेरामध्ये साध्वींचं लैंगिक शोषण होत असल्याचं लिहिलं होतं. त्यांनी ते पत्र छापलं. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या," असं प्रभु दयाल यांनी सांगितलं.

अखेर 24 ऑक्टोबरच्या रात्री छत्रपती यांच्यावर राहत्या घरी गोळ्या घालण्यात आल्या. 21 नोव्हेंबरला दिल्लीतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images

प्रभू दयाल सांगतात की, हॉस्पिटलमध्ये छत्रपती शुद्धीवर आले होते. पण राजकीय दबावाखाली त्यांचा जबाब नोंदवून घेतला गेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव अंशुल छत्रपती यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी CBIद्वारे व्हावी अशी याचिका केली.

पत्रकार रामचंद्र छत्रपती हे डेरा सच्चा सौदाबाबत बातम्या छापायचे. त्यामुळं त्यांना सतत धमक्या यायच्या असं अंशुल छत्रपतींनी सांगितलं.

घटनाक्रम

24 ऑक्टोबर 2002 च्या रात्री छत्रपती यांना त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालण्यात आल्या.

21 नोव्हेंबरला दिल्लीतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

डिसेंबर 2002मध्ये छत्रपती यांच्या कुटुंबानं स्थानिक पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत मुखमंत्र्यांकडं CBI चौकशीची मागणी केली.

जानेवारी 2003मध्ये अंशुल छत्रपती यांनी हायकार्टात याचिका दाखल करत CBI चौकशीची मागणी केली.

नोव्हेंबर 2003 हाय कार्टानं पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा प्रेमी रणजीत सिंह यांच्या हत्येबाबत CBIला FIR दाखल करण्याचे आदेश दिले.

फोटो स्रोत, Narendra Kaushik

डिसेंबर 2003मध्ये CBIनं चौकशीला सुरुवात केली .

त्याचवेळी डेरानं सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यामध्ये CBI चौकशी थांबवण्याची मागणी केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं चौकशी थांबवली होती.

नोव्हेंबर 2004मध्ये दुसऱ्या पक्षाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टानं CBI चोकशी पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले.

25 ऑक्टोबर 2017ला डेरामधल्या साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.

11 जानेवारी 2019 ला पत्रकर रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहीम सहित आणखी तिघांना कोर्टानं दोषी ठरवलं होतं.

त्यानंतर आज 7 मार्चरोजी सात वर्षानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या प्रकरणाचा निकाल आला असून कोर्टानं राम रहीमला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.