'पानसरे वर गेले असतील तर तुही जा,' आमदार संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी; 'शिवाजी कोण होता' पुस्तकावरून वाद

फोटो स्रोत, Facebook/Prashant Ambi & Sanjay Gaikwad

फोटो कॅप्शन, राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली आहे.
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप होत आहे.

संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असून आपण फोन करून पुस्तकावर आक्षेप घेतला असल्याचं म्हटलं आहे.

एकीकडे, प्रशांत आंबी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असा आरोप केला आहे तर दुसरीकडे, फोन रेकॉर्डिंगमध्ये काही शब्द तोडून मोडून ठेवले आहेत, असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

प्रकाशक प्रशांत आंबी यांनी हे फोन रेकॉर्डिंग व्हायरल करून 'आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही,' असं म्हटलंय.

आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी सायंकाळी कोल्हापुरातील बिंदू चौकात 'जोडे मारा आंदोलन' करण्यात येणार आहे.

तसेच, राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली आहे.

याप्रकरणी आज कोल्हापुरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.

यावेळी आंदोलकांकडून संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी आंदोलन आणि पोलीस यांच्यात संजय गायकवाड यांचा पुतळा काढून घेण्यावरून जोरदार झटापट झाली. अखेर पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

'ते वर गेले असतील तर तूही वर जा, असं मी त्याला म्हणालो'

आमदार संजय गायकवाड यांनी व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगला दुजोरा दिला असला तरी आपले काही शब्द तोडून मोडून ठेवले आहेत, असाही दावा केला आहे.

यामध्ये ते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावर आक्षेप घेताना दिसतात. पुस्तकाच्या शीर्षकात 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख का केला, असा प्रश्नही ते करताना दिसतात.

"पानसरे कोण? त्याचं काय हाल केलंय माहिती आहे ना तुला? तुझेही तेच हाल करू," अशा भाषेतील धमकीही या फोन रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येते.

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Gaikwad

फोटो कॅप्शन, संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असून आपण फोन करून पुस्तकावर आक्षेप घेतला असल्याचं म्हटलं आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय की, "21 एप्रिलला माझ्या पत्नीला एका कार्यक्रमात कुणीतरी हे पुस्तक भेट दिलं. ते मी घरी आणल्यावर वाचलं. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला छेडछाड करून त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख या पुस्तकात केला आहे."

"शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात वारंवार होणारी विटंबना आणि अपमान मला सहन होत नाही. हे पुस्तक गोविंद पानसरेंनी लिहिलंय का कुणी लिहिलंय मला देणंघेणं नाही, ते वर गेले असतील तर तूही वर जा, असं मी त्याला म्हणालो."

"फोनवर तो मुजोरी करत मला सारखा सारखा डिवचत होता, म्हणून मी त्याला शिव्या दिल्या," असंही त्यांनी म्हटलंय.

आमदार संजय गायकवाड याआधीही अनेकदा वादात अडकले आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी शिळं आणि खराब अन्न दिल्याचं कारण सांगत गायकवाडांनी मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातल्या कँटिनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. तेव्हाही ते चर्चेत आले होते.

प्रकाशक प्रशांत आंबी काय म्हणाले?

प्रशांत आंबी हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते AISF या विद्यार्थी संघटनेचे राज्यसचिव आहेत.

ते स्वत: लेखक असून त्यांनी 'बोद' ही कादंबरीही लिहिली आहे. ते गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या प्रकाशन-वितरणाचं काम पाहतात.

फोटो स्रोत, Facebook/Prashant Ambi

फोटो कॅप्शन, प्रशांत आंबी हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते AISF या विद्यार्थी संघटनेचे राज्यसचिव आहेत.

प्रशांत आंबी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "हे पुस्तक गोविंद पानसरे यांचं आहे आणि यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाहीये, असं सांगूनही ते शिवीगाळ करत होते. त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या. पण, अशा धमक्यांना मी भीक घालत नाही."

"शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपुढे पोहोचवण्याचं हे जे काम आहे, ते सातत्याने आम्ही करत राहू. कारण आम्ही सुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यांनी ज्या धमक्या आणि शिवीगाळ केली आहे, त्याविरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल करणार आहोत," असंही ते म्हणाले.

या लोकांनी लोकशाहीचा तमाशा चालवला आहे - स्मिता पानसरे

गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "लोकप्रतिनिधी असून पण इतक्या अर्वाच्च्य भाषेत स्त्रियांवरती शिव्या देणारं आणि त्यांना न शोभणारं वर्तन आहे. शिवाजी महाराज मूळातून न वाचता केवळ पुस्तकाचं शीर्षक वाचून असा आक्षेप घेणं चुकीचं आहे."

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, 16 फेब्रुवारी 2015 रोजी पत्नीसह मॉर्निंग वॉकला निघालेले असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

पुढे त्या म्हणाल्या की, "शिवाजी महाराजांचा वारसा जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा ते कृतीत उतरणं अधिक गरजेचं आहे. त्यांना विचारही माहिती नाही आणि विचारानुसार कृती करणंही माहिती नाहीये. त्यांचा जाहीर निषेध आहेच, पण त्यांची आमदारकीही रद्द व्हायला हवी."

"लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत पण खरं तर या लोकांनी लोकशाहीचा तमाशा चालवला आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचं भानच नाहीये. किंबहुना त्याच माज आलाय की काय, असं चित्र आहे. एकीकडे नारीशक्ती वंदनाची बात करायची आणि त्याचवेळेला दुसरीकडे मात्र स्त्रियांच्या बाबतीत शिवीगाळ करायचं, हे न शोभणारं वर्तन आहे," असंही त्या म्हणाल्या.

'शिवाजी कोण होता?' पुस्तकात नक्की काय आहे?

कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 साली हे पुस्तक लिहिलेलं होतं. या पुस्तकाच्या आजवर दीड लाखाहून अधिक प्रती वितरित झालेल्या आहेत. तसेच, अनेक भारतीय भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादीत झालेलं आहे.

या पुस्तकाचे अधिकार खुले असून 'लोकवाङ्मय गृह' या प्रकाशन संस्थेसह इतरही काही संस्थातर्फे ते प्रकाशित करून वितरित केले जाते.

गोविंद पानसरे हे पुरोगामी चळवळीतील विचारवंत होते तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.

16 फेब्रुवारी 2015 रोजी पत्नीसह मॉर्निंग वॉकला निघालेले असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

फोटो कॅप्शन, 'शिवाजी कोण होता?' हे अवघ्या 76 पानांचं पुस्तक आहे. या पुस्तकाला सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी सदिच्छा दिल्या आहेत.

गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी व्याख्याने दिली होती. त्यानंतर तीच मांडणी आपण पुस्तकरुपात केली, अशी माहिती गोविंद पानसरे यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिली आहे.

'शिवाजी कोण होता?' हे अवघ्या 76 पानांचं पुस्तक आहे. या पुस्तकाला सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी सदिच्छा दिल्या होत्या. त्या या पुस्तकात सुरूवातीला छापण्यात आल्या आहेत.

या सदिच्छांमध्ये ते म्हणतात की, "हे पुस्तक लिहून आपण पुरोगामी चळवळीवर व समाजावर मोठे उपकार केले आहेत. या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. विशेषत: प्रतिगाम्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरूणांपर्यंत ते पोहोचले पाहिजे."

या पुस्तकाचं शीर्षक एकेरी असण्याबाबत वारंवार वाद होताना दिसतो. याआधीही त्यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून साताऱ्यातील प्राध्यापिका डॉ. मृणालिनी आहेर यांना वर्षभर कोर्टाची पायरी चढावी लागली होती.

फोटो स्रोत, Madhushree Publication

फोटो कॅप्शन, 1949 साली गणेश कुऱ्हाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नावही 'शिवाजी कोण होता?' असंच आहे. शिवाय, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचं नावही 'दगलबाज शिवाजी' असंच आहे, असं स्मिता पानसरे सांगतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं. अंतिमत: कोर्टानं डॉ. मृणालिनी आहेर यांच्या बाजूनं निर्णय देत, या प्रकरणात कोर्टाची पायरी चढायला लावणाऱ्या पोलिसांना फटकारलं होतं. हे संपूर्ण प्रकरण तुम्ही इथे वाचू शकता.

पुस्तकाच्या शीर्षकासंदर्भात बोलताना गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे म्हणाल्या की, "पानसरे होते, तेव्हाही असे वाद झाले होते. पण 1988 रोजी हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीही 1949 साली गणेश कुऱ्हाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नावही 'शिवाजी कोण होता?' असंच आहे. शिवाय, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचं नावही 'दगलबाज शिवाजी' असंच आहे. शिवाजी महाराजांची बहुतांश गाणी, घोषणा, आरत्याही झालेल्या आहेत. त्यात एकेरी उल्लेख आहेत, याचा अर्थ तो अनादर आहे, असा होतो का?" असा प्रश्न त्या उपस्थित करतात.

प्रकाशक प्रशांत आंबी म्हणतात की,"हजारो राजे होऊन गेले, पण शिवाजी महाराजांनाच एवढे प्रेम का मिळाले? राजांनी केलेल्या लोककल्याणकारी कारभारामुळेच जनतेकडूनच त्यांचा शिवबा, शिवाजी, शिवा असा उल्लेख केला गेला. आपणसुद्धा लहानपणापासून 'जय शिवाजी, जय भवानी' म्हणतो. मग त्यातून आपल्याला राजांचा अनादर करायचा असतो का?"

"या पुस्तकाला विरोध होण्याचं मूळ कारण हेच आहे की, शिवरायांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा तसेच त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचू नये," असंही ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)